Tuesday, May 24, 2011

ही जळमटे कधी निघणार ??

  परवा फेसबुकवर एका महाशयांशी राजकारणाशी संबंधित लेखाचे निमित्त होऊन शाब्दिक चकमक घडली. या महाशयांनी त्यात एक असे विधान केले की,  रा. स्व. संघाची शिकवण ही "impractical" व "outdated" आहे.  या महाशयांना बहुधा संघाचे कार्य व हेतू नीट समजलेले नसावेत. किंवा कदाचित त्यांना हिंदुत्त्वाची allergy असावी.
   हिंदुंचे संघटन, उत्तम व्यक्तिमत्त्व घडण हे काम संघ करतो. स्वतःची संस्कृती जपायला सांगतो, मातृभूमीवर प्रेम व तिचे रक्षण करायला सांगतो... सध्या अनेक जण देशा-विदेशात फिरत असतात. तेव्हा त्यांनी नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की, जगभर असलेल्या धर्मांपैकी हिंदू व बौद्ध-धर्मीय लोक हे वेगाने आपली संस्कृती विसरत आहेत / सोडून देत आहेत. आता अमेरिकेत राहताना लक्षात येते की इथे (मी ऑस्टिन शहरापुरते बोलते) ठिकठिकाणी चर्चेस आहेत, लोक चर्चमध्ये जातात, मुलांना संडे स्कूलमध्ये घालतात - जिथे त्यांना धर्माचे शिक्षण मिळते. ही साईट बघा, म्हणजे संडे स्कूल काय असते याचा अंदाज येईल... http://www.kidssundayschool.com/Gradeschool/Lessons/lessonindex.php
  मुस्लिमांचा धर्माच्या बाबतीतला कट्टरपणा तर आपल्याला माहितच आहे.

  हे इतर धर्मीय असे करतात म्हणून आपण करावे असे नाही.. पण आपल्याला शंभर-दोनशे वर्षांनंतर आपली संस्कृती नष्ट झालेली आवडेल का ? आत्ता Native Americans बाबत बोलतात तसे कदाचित त्या वेळेला एखाद्या वस्तू-संग्रहालयातला गाईड  भगवद् गीतेकडे बोट दाखवून सांगेल की दोनशे वर्षांपूर्वी भारतात हिंदू नावाची जमात होती.. त्यांचा हा धर्मग्रंथ !!   .... असे झालेले चालेल का तुम्हाला ??
  नष्ट व्हायला नको असेल तर त्याची जाणीवपूर्वक जपणूक व्हायला हवी. ते आपोआप जपले जाईल असे सध्याच्या परिस्थितीवरून वाटत नाही.
 
  आता परत परत धर्म व संस्कृती हे शब्द येत आहेत, त्यामुळे त्याविषयी बोलणे आवश्यक आहे.
धर्म म्हणजे a righteous thing to do. धर्म काय करणे योग्य आणि काय अयोग्य याची शिकवण देतो. हिंदू धर्मात काय शिकवण आहे हे माहित करून घायचे असेल तर भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आयुष्यातील प्रत्येक चांगल्या/वाईट प्रसंगी वाटचाल करण्यासाठी गीता मार्गदर्शन करते, असे हिंदुच नव्हे तर इतर धर्मीय अभ्यासकांनीही म्हटले आहे. ( धर्माबद्दल एक चांगले सुभाषित सहज आठवले म्हणून इथे द्यावेसे वाटते :
   धृतिः क्षमा दमोस्तेयं शौचमिंद्रियनिग्रहः
   धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणं
)

आपला धर्म क्षमा करायला सांगतो, कुठेही इतर धर्मांना कमी लेखा, इतरांचे धर्मांतर करा असे सांगत नाही.. पण त्याचबरोबर स्वतःच्या धर्माचे रक्षण हे केलेच पाहिजे.
  
   आता संस्कृतीबद्दल बोलायचे तर त्यात दैनंदिन आचरण, भाषा, वेश, आहार याचा समावेश होतो. नुसत्या भाषेविषयी बोलायला लागले तर अनेक पाने भरतील.
   मला कळत नाही की अनेक सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांना इंग्रजी "फाडणे" मोठे भूषणावह का वाटते ? पुण्यातले उदाहरण द्यायचे तर हॉटेल मध्ये (विशेषतः शहराच्या काही विशिष्ट भागांत ) जेवायला गेल्यावर पदार्थ मागवताना इंग्रजीचा वापर का करायला लागतो ? मराठीत बोलले तर लाज वाटते ? "outdated" वाटते ? मुलांना नुसत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षाही "कॉनव्हेंट " मध्ये घातले तर कॉलर ताठ झाल्यासारखे का वाटते ??  "शुभ दीपावली" पेक्षा "happy diwali" का बरे वाटते ? केकवरची मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरे करता, पण आपल्या मुलांना निदान औक्षण तरी करता का ??  मुलांनी harry potter  वाचलेले अभिमानाने सांगता, पण त्याला फास्टर फेणे वाचायला आणून देता का ?  ग्लोबल किंवा आधुनिक गोष्टी अंगीकारणे म्हणजे स्वतःच्या मातीतल्या गोष्टी सोडून देणे असे होते का ?

   आता कोणी म्हणेल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत..याने आपल्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे.. ? बरोबर आहे.. दैनंदिन आयुष्यात काहीच फरक पडणार नाही.. पण दूरवरचा विचार करू या... ५०-६० वर्षांनी तुमच्या नातवंडांना "औक्षण" हा शब्द शोधायला, पहिल्यांदा मराठी शब्दकोष शोधून आणायला लागेल, व त्यात पाने हुडकून हा शब्द शोधावा लागेल.. !  आता कोणी म्हणेल की बदल तर जगात होतच राहणार.. त्याला काय करणार.. बरोबर आहे, पण गेल्या ५०० वर्षात जेवढे संस्कृतीत, भाषेत  बदल झाले नाहीत तेवढे या १०० वर्षात होतील, इतका जागतिकीकरणाचा रेटा भयानक आहे.. त्यामुळे ते वाचवण्यासाठी आपले प्रयत्नही तेवढेच जास्त सच्चे हवेत !
   (यात मला असे आजिबात म्हणायचे नाही की, इंग्रजी शिकू नये अथवा जेमतेम आली तरी चालेल. ती तर फार उत्तम आलीच पाहिजे.. अजून १-२ परकीय भाषा आल्या तर छानच आहे !  पण मराठी ही आपली प्रथम भाषा आहे, आणि ती जतन होण्याच्या दृष्टीने जिथे शक्य आहे तिथे तिचा पुरेपूर वापर व्हावा असे मला वाटते.)
  
    असेच वेशभूषा आणि आहार याबाबतीतही !   पास्ता / पिझा / sandwich  करायला शिकू या.. पण धिरडी, घावन, थालिपिठे नको विसरू या ... मी अशा काही मुली पाहिल्या आहेत की, ज्यांना परदेशी कामासाठी जायची संधी येते. त्यांना हे दडपण येते की तिथल्या कंपनीत कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत. शर्ट-trouser  अशा प्रकारच्या कपड्यांची त्यांना सवय नसते किंवा आवडत नाहीत. पण भारतीय पोशाख घालून जायचीही लाज वाटते. असे का ? हिंदुंना स्वतःच्या गोष्टींबाबत एवढा न्यूनगंड का ?  (अर्थात, आत्मविश्वास असलेलेही आहेत, पण नसलेलेही बरेच आहेत..)

  असले न्यूनगंड उखडून टाकून हिंदू समाजाला संस्कार, शिस्त, उत्साह व व्यायाम याद्वारे कणखर बनवण्याचे 
काम  संघाच्या शाखा करत आहेत. कुठल्याही जात, पंथ, धर्माच्या लोकांना तिथे निःशुल्क प्रवेश आहे. कोणालाही कमी लेखण्याचे शिक्षण संघ देत नाही, हे मी स्वानुभवावरून व निरिक्षणातून सांगते. शिवाय संघाने कुठलेही आधुनिक शास्त्र/ विद्या शिकण्याला विरोध केलेला नाही..अथवा जुन्या वाईट रूढींना चिकटून राहा असेही सांगितलेले नाही. संघात नियमित जात असलेले अनेक लोक आज विविध कार्यक्षेत्रात, देशा-विदेशात उत्तम तऱ्हेने कार्यरत आहेत. केवळ पांढरपेशा समाजासाठीच नव्हे तर दुर्गम खेड्या-पाड्यातील लोकांसाठी काम करत असलेल्या अनेक संस्थांना संघाचा सक्रिय पाठिंबा आहे, व स्वतःचेही सेवाकार्य (service to society) आहे.
   "impractical" व "outdated" असे हिणवून संघाच्या कार्याची खिल्ली उडवणाऱ्या लोकांच्या मनातील so called आधुनिकतेच्या कल्पनांची जळमटे कधी निघणार, असा मला प्रश्न पडतो !
   मी काही लेखिका नाही किंवा विचारवंतही नाही.. त्यामुळे माझ्या लिखाणात आणि विचारात त्रुटी असण्याची शक्यता आहे. पण माझा मुद्दा योग्य व महत्त्वाचा आहे, आणि मी तो कळकळीने मांडला आहे !
   तुम्ही तो वाचा, विचार करा, आणि पटले तर अंमलात आणा !  आणि नाही पटले तर......
परत एकदा वाचा !!  :-)


  






Wednesday, May 11, 2011

गंध

  आई-बाबांनी मला एक  पुस्तक पाठवले आहे. ते नवेकोरे पुस्तक उघडताच पहिल्यांदा जाणवला तो -- त्याचा गंध !  कोऱ्या पुस्तकाला एक वेगळाच गंध असतो. तो मला आवडतो. शिवाय या पुस्तकाला आणखी एक वेगळाच चंदनी सुगंध आहे. त्यामुळे पुस्तक उघडल्यावर पहिल्यांदा मी भरभरून तो सुगंध घेते..
   
   बरेचसे गंध असे असतात की ज्यांच्याबरोबर काही अनुभव, घटना अथवा भावना जोडलेल्या असतात. तो गंध आला की त्याच्याशी जोडलेली आठवण आपसूक येते.

   घरी काही पूजा, हळदीकुंकू वगैरे असले की आमची आई तिचे खास ठेवणीतले अत्तर काढते -सगळ्यांना लावण्यासाठी. (वाळा, केवडा , मजमूआ असे काहीतरी). त्या अत्तराच्या वासाशिवाय हळदीकुंकू ही कल्पनाच करता येत नाही.
   तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमधले लग्न आणि मोगऱ्याचा सुगंध यांचे पण नाते असेच अतूट आहे.
   आणि परफ्युम्स !  काही लोकांचे परफ्युम्स ही त्यांची ओळख असते. ती व्यक्ती येऊन गेली तरी सुगंध मागे दरवळत राहतो..  शिवाय, नेलपेंट रिमूव्हरचा वास आवडणारेही माझ्यासारखे काही  जण  असतात.
  
   याशिवाय खाद्यपदार्थ !!  बेसन भाजल्याचा, चकल्या तळल्याचा   वास घरोघरी येऊ लागला की समजायचे दिवाळी आली !  दिवाळीच्या आधी ८ दिवस हे खमंग वास आसमंत भरून टाकतात..
   याच्यावरून आठवण झाली.  माझ्या apartment च्या खाली कोणीतरी भारतीय रहायला आले आहेत. रोज
दुपारचे बारा-साडेबारा झाले की काय सांगू ! डोशाचा अस्सा मस्त वास यायला लागतो न त्यांच्याकडून !!  पदार्थांच्या वासांमुळे भारतीय घरे लपून राहणे शक्यच नाही !
   हापूस आंब्यांचा वास हाही एक असाच अद्वितीय वास आहे ! आंब्याचा स्वाद स्वाद जे म्हणतात त्यात चवीएवढाच  वासाचाही अंतर्भाव असतो.

   काहीकाही पदार्थांचे वास मात्र सगळ्यांना आवडतीलच असे नाही.  उदा.-  लोणी कढवल्याचा वास हा काहींना खमंग वाटतो, तर माझ्या नवऱ्यासारखे काही या वासाने नाक मुठीत धरून बाहेर पळतात.  

   फक्त माणसांनाच गंधाचे वेड असते असे नाही.  आमचा कुत्रा पोगो ! मी लाडू करायला घेतले की तो लगेच स्वयंपाकघरात येतो. लाडू वळून होऊन पहिला लाडू त्याला मिळाला की मगच तो तिथून मुक्काम हलवतो.  आहे की नाही मजा ?

   इतके सगळे छान छान वास (आणि छान छान पदार्थ :)  या जगात आहेत, हे आपले भाग्यच आहे.

Friday, May 6, 2011

गैरसमज

   आम्ही काल संध्याकाळी चालायला गेलो होतो.  घराच्या जवळ एका चौकात आम्ही रस्ता पार करण्यासाठी थांबलो. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना रिकामी जागा आहे. त्यावर हिरवळ उगवली आहे. थोडे पुढे गेले की गिरीशची कंपनी लागते.

   आम्ही त्या रस्त्याच्या कडेने चालत असताना एक मोठा पक्षी वर घिरट्या घालत असलेला आम्हाला दिसला. गरूड का घार का condor (गिधाडाच्या जातितला एक पक्षी) असावा ?   तो हळूहळू घिरट्या घालत खाली उतरू लागला. नक्कीच त्याने काहीतरी हेरले असावे. काही अंतरावर एक चढ असलेली जागा होती. तिथे तो उतरला. आम्ही तिकडे पहिले तर तो जिथे उतरला तिथे जवळच पांढरट राखाडी असे काहीतरी दिसत होते.. ते घरटे असावे का ?  टिटवीचे वगैरे ??  आम्हाला काही क्षणांपूर्वीच त्या रस्त्यावर दोन टिटव्या दिसल्या होत्या. त्यामुळे ती पांढरट राखाडी गोष्ट म्हणजे टिटवीचे घरटे असावे असे आम्हाला वाटले.
    आता तो पक्षी त्या पांढरट गोष्टीत तोंड घालून काहीतरी उचलत होता व खात होता.. नक्कीच पिल्ले !  नक्कीच पक्ष्याची पिल्ले खात होता !!  कुठलाही पक्षी इतकी उघड्यावर कशी पिल्ले ठेवेल असे वाटून गेले.. पण तरीही तो condor का कोण तो, पिल्लांचाच फन्ना उडवत होता असे आम्हाला वाटले.
   लांबूनही त्या condor चे उघडे (पिसे नसलेले ) लालसर डोके दिसत होते. त्या पक्ष्याला उडवून लावावे का असेही वाटले. पण त्याचे आकारमान पाहता हिंमत झाली नाही... शेवटी त्या बळी पडलेल्या पिल्लांबद्दल हळहळत आम्ही घरी गेलो.
   घरी गेल्यावर त्या पक्ष्याबद्दल Internet वर माहिती शोधली. तर साधारण तसे दिसणारे दोन पक्षी आढळले - एक :  California Condor - जी जात खूपच धोक्यात आलेली आहे, व दुसरा : Turkey Vulture..
CaliforniaCondor सारखा जवळपास नामशेष होत चाललेला पक्षी इतक्या सहजपणे दिसणे जरा अशक्य वाटले.. त्यामुळे तो पक्षी Turkey Vulture  असावा असे आम्ही धरून चाललो. त्याचा आहार मुख्यत्त्वे carcasses  म्हणजे मृत प्राणी असतो असे लिहिलेले  होते.
   दुसरे दिवशी आम्ही फिरायला परत बाहेर पडलो. आज त्या जागी जाऊन ती पांढरट राखाडी गोष्ट बघावी असे ठरवले. तिथे जाऊन बघतो तर काय... !  ते घरटे-बिरटे असे काही नव्हतेच !  ती होती पक्ष्याची काळपट - पांढरी अशी पिसे !   बरीच पिसे ..!   आम्हाला दोघांनाही एकदम काय घडले होते याची जाणीव झाली. एक पक्षी मरून पडला असावा व त्याला खायला ते Turkey Vulture खाली उतरले असावे.. बरोबर ! गिधाडे मेलेले पशु-पक्षी खाऊन निसर्गाची जणू स्वच्छताच करत असतात असे पूर्वी वाचलेले आठवले.
   आम्ही उगाचच त्या काल्पनिक पिल्लांविषयी हळहळत त्या गिधाडाला नावे ठेवत होतो  !!